चापगाव : खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातही जंगली प्राण्यांनी हैदोस मांडला आहे. कारलगा, शिवोली जंगल भागात येणाऱया शिवारात गव्यांनी भातशेतीत घुसून मोठे नुकसान करायला सुरुवात केली आहे.
कारलगा येथील देवाप्पा रामचंद्र पाटील, सुरेश मारुती पाटील आदी शेतकऱयांच्या भातपिकात गेल्या दोन दिवसांपासून गव्यांच्या कळपाने संपूर्ण पिकच संपवून टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा भात लागवड करणे किंवा पेरणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱयांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यासाठी वनखात्याने ताडतीने पंचनामा करून शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कारलगा, शिवोली, हेब्बाळहट्टी, अल्लेहोळ, हडलगा आदी गावच्या जंगलाच्या शेजारील शेत जमिनीतील पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गवे, डुक्कर, माकडे यासह मोर यांची संख्या अलीकडे वाढली आहे. जंगली डुकरांपासून ऊस पिकाचे मोठे नुकसान होत आहे. वनखात्याने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरीवर्गातून होत आहे.