गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सुरक्षा वाढवली
ऑनलाईन टीम/तरुण भारत
सोलापूर दौऱ्यावेळी घडलेल्या प्रकारांनंतर सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले होते. यांनतर लगेच आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
दरम्यान, टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीच्या नेत्यापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी.
सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेलचालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. २०१४ सालच्या लोकसभेवेळी हॉटेलचे जेवणाचे बिल दिले नसल्याचा आरोप करत हॉटेल चालकाने त्यांना अडवून हुज्जत घातली होती. मात्र, हे आरोप खोटे असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीचा नेता यामागे होता. तसंच राष्ट्रवादी पक्षापासून विशेषत: पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोपही त्यांनी केला होता.