तरुणभारत ऑनलाइन
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पावसाने उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी आणि वारणा धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत दिवसभरात दोन फूट वाढ झाली आहे.यामुळे येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
दरम्यान रक्षाबंधनाची सार्वजनिक सुट्टी आणि गुरुवार अशा दुहेरी योगावर आलेल्या नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचबरोबर आज असंख्य भाविकांनी नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री दर्शनाबरोबर कृष्णा नदीला श्रीफळ अर्पण करून महापुराचे संकट पुन्हा नको अशी मनोभावे प्रार्थना केली. दत्त मंदिर कृष्णा पंचगंगेला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेले असले तरी भक्त भाविकांच्या दर्शनासाठी श्रींचे उत्सव मूर्ती दत्त मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आले आहे .