ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी करत बंडखोर व भाजपवर तोंडसुख घेतले.
भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत इरादा स्पष्ट केला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर आल्यानंतर दोन गोष्टी पाहिल्या. एक रिकामी खूर्ची आहे, मी एक खुलासा करू इच्छितो नाही तर उद्या एक चौकट यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. मिंधे सगळे तिकडे गेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. आणि लढाईसाटी सोबत आहे, तलवार हाती घेऊन आघाडीवर आहे. आणि दुसरी गोष्ट पाहिली आमचे वडील आहेत का व्यासपीठावर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकलीय, पण बाप पळवणारी औलाद सगळ्या महाराष्ट्रातून फिरतेय. असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय?
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून कमळाबाईचा उल्लेख आल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर, आज त्याच मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला डिवचलं आहे. भाजपाचा उल्लेख कमळाबाई असा करत कमळाबाई नाव कोणी ठेवलं याचीही आठवण करून दिली. आज गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेचा गटनेते मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सत्ताधारी आणि केंद्रावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई हे नाव मी दिलेलं नाही. हे नाव शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं. दुर्दैवाने याच कमळाबाईसोबत आम्हाला युती करावी लागली.
वंशवादावरून टीका होते, कुटुंबावर टीका होते, मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली तेव्हा माझे आजोबा त्यात सामील होते. पाच अग्रणी नेत्यांमध्ये माझे आजोबा होते. रण पेटलेलं असताना निवडणुका आल्या. परंतु, जनसंघाने ही समिती फोडली. ही त्यांची औलाद. दुर्दैवाने आम्ही त्यानंतर त्यांच्याशी युती केली. आम्हाला आमचा वंश आहे. पण तुमचा वंश कोणता? तुमचा वंश कोणता इथून वाद आहे. बावनकुळे की एकशेबावनकुळे हेच कळत नाही, अशी तुफान फटकेबाजी आज उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात केली.