निर्मितीवेळी गेला होता 1.20 लाख लोकांचा बळी
दुसऱया महायुद्धादरम्यान निर्माण करण्यात आलेला थायलंड ते म्यानमार रेल्वेमार्गाला ‘डेथ रेल्वे’ म्हणून ओळखले जाते. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीत 1 लाख 20 हजार लोकांचा जीव गेला होता असे मानले जाते. हा रेल्वेमार्ग 415 किलोमीटर लांबीचा आहे. युद्धानंतर रेल्वेमार्गाची दुरुस्ती करत तो सेवेसाठी बहाल करण्यात आला होता. अद्यापही कंचनबुरीच्या उत्तरेत नाम टोकपर्यंत प्रवासी सेवा सुरू आहे. या रेल्वेमार्गावर सर्वात प्रसिद्ध आणि भयावह क्वाई नदीवरील पूल आहे.
दुसऱया महायुद्धात बजावलेल्या भूमिकेसाठी या रेल्वेमार्गाला ओळखले जाते. युद्धादरम्यान जपानच्या सैन्याने सिंगापूरहून म्यानमारपर्यंतच्या क्षेत्रांवर कब्जा केला होता. जपानचे सैन्य म्यानमारमध्ये स्वतःच्या सैनिकांसाठी एक सुरक्षित भुमार्ग इच्छित होते. तर त्यापूर्वीच बँकॉकहून हुआ हिन आणि दक्षिणेपर्यंत एक रेल्वेमार्ग होता. परंतु जपानकडून बँकॉकच्या पश्चिमेत एक ब्रँच लाइन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
थायलंडहून म्यानमारपर्यंत रेल्वेमार्गाची निर्मिती थायलंडमध्ये नोंग प्लाडुक (कंचनबुरीहून 50 किलोमीटर अंतरावर) आणि म्यानमारमध्ये थानबुयाजनदरम्यान सुमारे 415 किलोमीटर अंतरासाठी करण्यात आली होती. जून 1942 मध्ये रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले आणि 15 महिन्यांनी ते पूर्ण झाले.
थायलंड, चीन, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया आणि सिंगापूरसह आशियाई देशांमधून सुमारे 1 लाख 80 हजार लोक तर 60 हजार युद्धकैद्यांना या रेल्वेमार्गाच्या निर्मितीत जुंपण्यात आले होते. येथील स्थिती अत्यंत हलाखीची होती आणि जपानी सैन्याकडून क्रूर वागणूक देण्यात येत होती. मलेरिया अन् आजारांसोबत उपासमारीमुळे 16 हजार कैदी तसेच कमीत कमी 90 हजार मजुरांना जीव गमवावा लागला होता.