दिग्विजय सिंह देखील भरणार अर्ज ः अशोक गेहलोत पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना भेटणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दोन्ही प्रकरणी आता गुरुवार म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची गुरुवारी भेट घेणार असून यानंतरच दोन्ही पदांसंबंधीच निर्णय होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी आता नाममात्र दिवस शिल्लक राहिले आहेत. रिटर्निंग ऑफिसर मधुसूदन मिस्त्राr हे 29 सप्टेंबर रोजी दिल्लीत उपलब्ध नसल्याने उमेदवार केवळ अखेरचा दिवस म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी अर्ज भरू शकतात.
तर दुसरीकडे अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह यांचे नाव चर्चेत आले आहे. दिग्विजय सिंह हे भारत जोडो यात्रा सोडून दिल्लीत दाखल होणार आहेत. अध्यक्षपदासाठी अर्ज भरू शकतो, असे दिग्विजय यांनी केरळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे हे देखील गांधी परिवाराच्या निर्देशानुसार पक्षाध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. खर्गे यांनी लोकसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहिले आहे. तसेच आता ते राज्यसभेत विरोधीपक्षनेते आहेत.
राजस्थानात राजकीय चढाओढीदरम्यान बुधवारी दुपारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभा अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी, मंत्री शांति धारीवाल समवेत अनेक वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली आहे. गेहलोत हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचा दावा मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी केला आहे. गेहलोत हे अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार की नाही याची माहिती केवळ मुख्यमंत्री किंवा पक्षनेतृत्त्व देऊ शकणार असल्याचे खाचरियावास म्हणाले. राजस्थान काँग्रेसमध्ये कुठलेच संकट नसल्याचा दावा काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.
आरटीडीसी अध्यक्षाचे वादग्रस्त विधान
गहलोत समर्थक धर्मेंद्र राठौड यांनी सचिन पायलट समर्थकांवरून वादग्रस्त विधान केले आहे. हरियाणाच्या मानेसर येथे गेलेल्या आमदारांची तुलना त्यांनी घरातून पळालेल्या युवतीशी केली आहे. काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या तीन नेत्यांमध्ये राठौड यांचा समावेश आहे. राठौड हे आरटीडीसी अध्यक्ष आहेत.
लवकर निघणार तोडगा
भारत जोडो यात्रा आणि अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान राजस्थान काँग्रेसमधील कलह पुन्हा समोर आला आहे. राजस्थानमधी पक्षांतर्गत संकटावर एक किंवा दोन दिवसांत तोडगा काढला जाईल. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो आणि आमच्या पक्षात सर्वकाही लोकशाहीच्या मार्गाने चालत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले. मुख्यमंत्रिपदासाठी गेहलोत गटाच्या विरोधाला तोंड देणारे सचिन पायलट हे दिल्लीत ठाण मांडून आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त पायलट किंवा त्यांच्या समर्थकांनी कुठलेच विधान केलेले नाही. त्यांच्या या मौनाला पक्षासाठी गंभीर मानले जात आहे.