कोथिंबीर, लिंबू दरात घट
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवड्याच्या तुलनेत किरकोळ बाजारात भेंडी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबुच्या दरात घसरण झाली आहे. मात्र इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. विशेषत: वाढत्या उन्हामुळे गाजर, बिट, काकडी, दूधीभोपळा आदी भाज्यांना मागणी वाढू लागली आहे. मात्र शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे भाजीपाला बाजारावर परिणाम झाला. भाजीपाला बाजार दुपारनंतर थंड पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे काही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याची विक्री बंद करून घरी जाणे पसंत केले.
शनिवारच्या आठवडी बाजारात वांगी 40 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, दोडकी 40रु. किलो, फ्लॉवर 20 रुपये एक, शेवग्याच्या शेंगा 20 ला एक पेंडी, गाजर 60रु. किलो, ओली मिरची 60 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, भेंडी 30रु. किलो, गवार 40 रु. किलो, कारली 60 रु. किलो, ढबू 60रु. किलो, कोबी 20 रुपयाला एक, कोथिंबीर 10 रुपये, कांदा पात 20 रुपयाला चार पेंड्या, पालक 20 रुपयाला चार पेंड्या, लाल भाजी 20 रुपयाला तीन पेंड्या, मेथी 20 रुपयाला तीन पेंड्या, लहान लिंबू 10 रुपयाला पाच असा भाजीपाल्याचा दर आहे.
वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कांदापात, मेंथी, लालभाजी, पालक, शेपू आदी भाज्यांचे दर टिकून आहेत. मागील काही दिवसापासून वाढलेल्या लिंबुचा दरदेखील कमी झाला आहे. सात-आठ रुपयाला मिळणारा एक लिंबू तीन रुपये झाला आहे. लिंबुची आवक वाढू लागल्याने दरात घट होऊ लागली आहे.
वळीव पावसाने दडी मारल्याने उष्म्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. विशेषत: रसवंती गृह आणि ज्युसच्या गाड्यांवर गर्दी होऊ लागली आहे. काही भाज्यांचे दर चढे तर काही भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी प्रमाणात दिसत आहे. मात्र टोमॅटोची आवक वाढली आहेत. त्यामुळे टोमॅटो किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलोदराने विकले जात आहेत. तर होलसेल बाजारात 5 ते 6 रुपये किलो टोमॅटोचा दर होऊ लागला आहे. त्यामुळे उत्पादकांना परवडेनासे झाले आहे. दरम्यान काही उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत.