पुणे / प्रतिनिधी :
समाजातील विशेषत: राजकारण्यांची बौद्धिक पातळी घसरली आहे. अलीकडचे राजकारणी हे लक्ष्मीच्या प्रेमात आहेत. त्यामुळे त्यांना सरस्वतीचे महत्त्व कळत नाही. त्यांना सरस्वती आवडत नाही, असा निशाणा कादंबरीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव न घेता शुक्रवारी साधला.
मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रसाद ओक लिखित ‘माझा आनंद’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिग्दर्शक प्रवीण तरडे, मंजिरी ओक, शब्दांकन करणाऱ्या प्रज्ञा पोवळे, प्रकाशक अखिल मेहता या वेळी उपस्थित होते.
अधिक वाचा : …तर सेना दुर्बिणीने शोधावी लागेल, सत्तारांचा उद्धव ठाकरेंना इशारा
पाटील म्हणाले, राजकीय लोकांना इतिहास-भूगोल माहिती नाही. शाळेत पहिल्यांदा सरस्वतीची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तुम्हाला माहिती नसेल पण सावित्रीबाई फुले यांनी देखील सरस्वतीची उपासना केली होती. शाळेत त्या पूजा करत असत, त्यावेळी महात्मा फुले त्यांच्या मागे उभे असत. सावित्रीबाई यांच्या ‘काव्य फुले’ या पुस्तकात सरस्वती उपासनेचा उल्लेखही आहे. सरस्वती ही फक्त हिंदूची देवता नाही. बौद्ध धर्मियांमध्ये मंजुश्री, जैन धर्मियांमध्ये योगेश्वरी नावाने तिची पूजा केली जाते. सिलोन, जपान, जकार्तामध्ये तिची पूजा होते.
सध्या लोकांची बौद्धिक पातळी खाली आली आहे. माणसे गरीब असतात, कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरीब माणसांना आधार विद्येचा व कलेचा असतो, म्हणजेच सरस्वतीचा असतो. त्यामुळे सरस्वतीचा अपमान हा या देशातील गरीबीचा अपमान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर लक्ष्मी खोके आहे आणि सरस्वती डोके आहे, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले. भारतीय संस्कृतीचा जयघोष केवळ जनसंघाने केला नाही, तर समाजवाद्यांनी केला आहे. भारतीय संस्कृती हिमालयासारखी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.