पुणे / प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस (म्हणजे 26 जानेवारी पर्यंत) ना थंडी, ना गारपीट तसेच वा पावसाची शक्यता जाणवत नाही, असा अंदाज निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला संपूर्ण महाराष्ट्र व मध्य भारताच्या मध्यातून एका-पुढे- एक सरळ अश्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या सध्या प्रणाल्या आहेत. हवेच्या या उच्चदाबाच्या अँटीसायक्लोन प्रणाल्यांच्या मध्यातून छेदून जाणाऱ्या पूर्व-पश्चिम रेषे (‘रीज’)मुळे उत्तर भारतातून थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव करणारी नकळत एक पूर्व-पश्चिम हवेच्या उच्च दाबाची काल्पनिक भिंतच महाराष्ट्रात तयार झाली आहे. यामुळे उत्तर भारतातून ईशान्ये दिशेकडून थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून सध्या वाहणारे वारे अटकाव करत आहेत. त्यामुळेच आपल्याकडे ईशान्येकडून थंडी घेऊन येणारे वारे ठप्प झाले आहेत सध्या उत्तर भारतात जबरदस्त पाऊस, बर्फ, थंडी पडत असूनही आपल्याकडे पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेली जाणवत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात विशेष कडाक्याची थंडी सध्या जाणवत नाही. परंतु महाराष्ट्रात पुढे थंडीची आवर्तने येणारच आहेत. 26 जानेवारीनंतर वातावरणात काहीसा बदल जाणवण्याची शक्मयता आहे, असे खुळे यांनी सांगितले.
अधिक वाचा : कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय दिल्लीतूनच
दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी नाशिक येथे सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.