ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी आपलं भोंगाविरोधी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. तसेच 2-3 दिवसात सर्व कार्यकर्त्यांना एक पत्र देणार आहे. ते त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व जनतेपर्यंत पोहचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali sayyed) यांनी राज ठाकरेंवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.
दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला.”
मनसेचे भोंगाविरोधी आंदोलन एक दिवसापूरते मर्यादित नाही, ते सुरूच राहील. हे आंदोलन प्रत्येक वेळी रस्त्यावरच करावं असं नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक पत्र देणार आहे, ते पत्र तुम्ही महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचवायचं आहे. मी भोंग्यांचा विषय काढला आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. जवळपास 92 ते 94 टक्के ठिकाणी भोंग्यांचे आवाज कमी झाले आहेत. खरंतर माझी मागणी आवाज कमी करण्याची नाही तर लाऊडस्पीकरच काढून टाकण्याची आहे, असे राज ठाकरे आजच्या सभेत म्हणाले होते.