ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syyed) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले, सय्यद यांनी भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांची भेट घेऊन राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचला होता. राज ठाकरेंच्या नियोजित अयोध्या दौऱ्यात सय्यद बृजभूषण सिंह यांना प्रोत्साहित करत होत्या, यासाठी त्यांना एका मोठय़ा नेत्याचाही पाठिंबा होता.
अधिक वाचा : पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जणांना अटक
दरम्यान, दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 700 ते 800 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून हा पैसा चुकीच्या मार्गाने आला आहे. या ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत. सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून 50 लोकांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार दिले होते. पुरस्कारामध्ये या 50 लोकांना 50 हजारांचे धनादेश देण्यात आले होते. पुरस्कारात देण्यात आलेले चेक बनावट असल्याचाही आरोप शिंदे यांनी केला आहे. तसेच सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असून, याचे सर्व पुरावे देऊ असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिंदे यांच्या या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, दिपाली सय्यद यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.