वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात गुन्हेगारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मागील महिन्यात सिसोदिया यांनी आसाममध्ये पीपीई किट घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आसाम सरकारने शर्मा यांच्या पत्नीची कंपनी आणि त्यांच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदार कंपनीला पीपीई किट पुरवठय़ाचे कंत्राट दिले होते असा आरोप सिसोदियांनी केला होता. तर शर्मा यांच्याकडून आसामच्या कामरुप येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना महामारीदरम्यान 2020 मध्ये पीपीई किट्सच्या पुरवठय़ाची ऑर्डर बाजारभावापेक्षा अधिक किमतींवर संबंधित कंपन्यांना देण्यात आली होती असा आरोप सिसोदियांनी केला होता.
सिसोदिया यांच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, पीपीई किट तयार करणाऱया आमच्या कंपनीने कधीच कुठले बिल दिलेले नाही. त्या काळात राष्ट्रीय आरोग्य मिशनने पीपीई व्यवसायाशी निगडित लोकांना किट पुरवठय़ाची विनंती केली होती. कंपनीने स्वतःच्या सीएसआरच्या हिस्स्यादाखल 1500 पीपीई किट्सचा पुरवठा मोफत केला होता असा दावा शर्मा यांच्या वकिलाने केला आहे.