कोलकात्यातील सभेत अमित शाह यांचे वक्तव्य : भाजप सत्तेवर येणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिवाद सभेला संबोधित केले आहे. ममता बॅनर्जी सरकारने गरीबांचा विश्वासघात केला आहे. बंगालची जनता तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटविणार आहे. 2024 मध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
बंगालला विकासाच्या वाटेवर अग्रेस करण्याचे काम केवळ भाजपच करू शकतो. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला सुमारे 2.30 कोटी मते आणि 77 जागांचा आशीर्वाद दिला आहे. लोकांमधील उत्साह पाहता 2026 मध्ये राज्यात भाजप सरकार येणार हे निश्चित आहे. ममता बॅनर्जी यांनी आमच्या एका नेत्याला दुसऱ्यांदा विधानसभेतून बरखास्त केले आहे. ममता बॅनर्जी या आमच्या नेत्याला बरखास्त करू शकतात, परंतु बंगालच्या जनतेला गप्प करू शकत नाही असे शाह म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये 27 वर्षे कम्युनिस्टांचे शासन राहिले. तर ममता दीदी यांच्या सरकारचा हा तिसरा कार्यकाळ आहे. कम्युनिस्ट आणि ममता बॅनर्जी यांनी मिळून बंगालला अधोगतीकडे लोटले आहे. पूर्ण देशात निवडणुकीच्या काळात सर्वाधिक हिंसा बंगालमध्ये होते. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी रोखण्यास असमर्थ ठरल्या आहेत. राज्यात घुसखोरांना उघडपणे मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड वितरित करण्यात येत असून ममता बॅनर्जी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
‘सोनार बांगला आणि मां माटी मानुष’ या नाऱ्यासोबत कम्युनिस्टांना हटवून ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या. परंतु बंगालमध्ये कुठलेच परिवर्तन घडलेले नाही. आज देखील बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसा, भ्रष्टाचार होत आहे. 2026 मध्ये राज्यात भाजप सरकार सत्तेवर आणायचे असल्याचा याचा पाया 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रचून नरेंद्र मोदींना मोठा पाठिंबा द्या असे आवाहन शाह यांनी केले आहे.
ज्या बंगालमध्ये कधी पहाटे रविंद्र संगीत ऐकू यायचे, तेथे आज बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येतात. पूर्ण देशातून गरीबीचे उच्चाटन होत आहे, परंतु बंगालमध्ये गरीबी कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण देशातून दहशतवाद संपविला आहे. काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यासाठी बंगालचे सुपुत्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले होते. हे कलम 370 मोदींनी समाप्त केले आहे. डाव्यांचा उग्रवाद संपविण्यास यश आले आहे. भारताचा तिरंगा चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्रावर पोहोचला असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.