5 दिवसांचा असणार दौरा ः जपानसोबत ‘टू प्लस टू’ चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज मंगोलिया अन् जपानच्या पाच दिवसीय दौऱयावर रवाना होणार आहेत. दोन्ही देशांसोबत भारताच्या संरक्षण अन् सुरक्षा संबंधांचा विस्तार करणे हा या दौऱयामागचा उद्देश आहे. जपानमध्ये राजनाथ सिंह आणि विदेशमंत्री एस. जयशंकर हे जपानच्या संरक्षण अन् विदेश मंत्र्यांसोबत ‘टू प्लस टू’ प्रारुपात चर्चा करणार आहेत.
राजनाथ सिंह हे 5-7 सप्टेंबरपर्यंत मंगोलियाच्या दौऱयावर असणार आहेत. तर 8-9 सप्टेंबर रोजी त्यांचा जपान दौरा प्रस्तावित आहे. ‘टू प्लस टू’ प्रारुपाच्या अंतर्गत भारत आणि जपानमधील चर्चा 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे मानले जात आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सामील होण्यासाठी भारताच्या दौऱयावर आल्याच्या सुमारे 5 महिन्यांनी ही चर्चा होणार आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या शिखर परिषदेत किशिदा यांनी पुढील 5 वर्षांदरम्यान भारतात सुमारे 3,20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य घोषित केले होते.
‘टू प्लस टू’ चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वृद्धींगत करण्याच्या पद्धतींवर विचारविनिमय करण्यासह हिंद-प्रशांत क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जपानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेशमंत्री योशिमासा हयाशी आणि संरक्षणमंत्री यसुकाजू हमादा करणार आहेत. दोन्ही देशांमधील ‘टू प्लस टू’ प्रारुपांतर्गत चर्चेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. भारताचा काही देशांसोबतच ‘टू प्लस टू’ प्रारुपाच्या अंतर्गत मंत्रीस्तरीय संवाद होतो आणि यात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशियाचा समावेश आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मंगोलियाच्या दौऱयातील तेथील संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल सैखानबयार यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तर मंगोलियाचे अध्यक्ष यू खुरेलसुख आणि स्टेट ग्रेट खुरालचे (संसद) अध्यक्ष जी जानदनशतार यांची भेट घेणार आहेत. द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री संरक्षण सहकार्याची समीक्षा करतील आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या नव्या शक्यतांवर विचारविनिमय करणार आहेत.