दोघांना अटक, बळींच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसानभरपाई, उच्चस्तरीय चौकशी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वेस्थानकानजीक इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या चौकशीचा आदेश दिल्ली सरकारकडून देण्यात आला आहे. या आगीत 27 जणांचा बळी गेला असून 35 अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये बव्हंशी महिला असल्याचे सांगण्यात आले. 27 पैकी अवघ्या 5 मृतांची ओळख पटली असून इतर मृतदेह जळून कोळसा झाल्याने डीएनएच्या आधारे त्यांची ओळख पटविण्याचे कार्य सुरू आहे. मृत तसेच बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर उदासीनता दाखविल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. केजरीवाल यांनी शनिवारी अधिकृतरीत्या या भीषण दुर्घटनेची माहिती पत्रकारांना दिली. त्यांनी दिल्ली सरकारच्यावतीने मृतांच्या वारसदारांना दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई घोषित केली. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचे स्पष्ट केले. दिल्ली सरकारने बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हेल्पलाईनची सुरुवात केली आहे. या घटनेची न्यायदंडाधिकाऱयांकडून चौकशी केली जाणार आहे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा लवकरात लवकर मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
इमारतीचा आराखडा मागविला
आगग्रस्त इमारत तीन मजली असल्याचे प्रारंभी सांगण्यात आले होते. तथापि, ती चार मजल्याची असल्याचे समजते. या इमारतीचा बराच भाग अनधिकृत असल्याचेही बोलले जात आहे. या इमारतीत विविध कंपन्यांची कार्यालये होती. तळमजल्यावरील एका कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असे प्राथमिक अनुमान आहे. मात्र, सर्व शक्मयता गृहित धरून चौकशी सुरू आहे. दिल्ली महानगरपालिकेने इमारतीचा आराखडा मागविला असून फायर ऑडिटचीही तपासणी केली जाणार आहे. इमारतीला ‘ना आक्षेप प्रमाणपत्र’ देणाऱया अधिकाऱयांचीही चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
नातेवाईकांची धावपळ
या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या तसेच बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांची त्यांचा शोध घेण्यासाठी एकच धावपळ सुरू आहे. अनेक मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झालेला असल्याने ओळख पटविण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांचा धीर सुटत चालला असून प्रशासनाविरुद्धचा त्यांचा संतापही वाढत आहे. प्रशासनाने वेळीच हालचाल केली असती तर इतक्मया मोठय़ा संख्येने बळी पडले नसते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. शनिवारीही पूर्णतः जळालेले काही मृतदेह इमारतीच्या आतील भागात आढळून आले आहेत. 75 टक्के इमारत जळून खाक झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्लीतील सर्वच इमारतींचे फायर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या भीषण दुर्घटनेची जबाबदारी कोणाची? यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे पेव फुटले आहे. दिल्ली सरकारचा गोंधळ आणि हलगर्जीपणा अशा घटनांना जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तथापि, या इमारतीला आमच्या कार्यकाळात अनुमती देण्यात आली नव्हती, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने शनिवारी रात्री साहाय्यता कार्य थांबविले आहे. आग पूर्णतः विझविण्यात आली असून आता इमारतीचा पंचनामा करण्यात येत आहे.
कारण अद्याप गुलदस्त्यात
इमारतीला आग कशी लागली आणि पाहता पाहता इतकी पसरली कशी? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आग भडकली तेव्हा इमारतीत नेमकी किती माणसे होती? याबद्दलही संभ्रमाची अवस्था आहे. काहींच्या म्हणण्यानुसार इमारतीत तीनशेहून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. तथापि, अधिकृत माहितीनुसार ही संख्या 180 च्या आसपास होती. सीसीटीव्ही फुटेजवरून नेमक्मया घडामोडी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.