वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या मेट्रो रेल्वे वाहतूक सेवेने आपली 21 वर्षे पूर्ण करुन 22 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 2002 मध्ये याच दिवशी, अर्थात, 24 डिसेंबरला भारतातील प्रथम मेट्रोसेवेचा प्रारंभ दिल्लीत करण्यात आला होता. तेव्हापासून दिल्लीच्या नागरी वाहतुकीची ही मेट्रोसेवा जीवनरेखा झालेली आहे. दिल्लीच्या मेट्रो यशानंतर भारतात अनेक शहरांमध्ये अशा वाहतूक सेवांचा प्रारंभ करण्यात आला आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानीच्या भागात या मेट्रोसेवेचे जाळे पसरण्यात आले आहे. दिल्ली मेट्रो ही देशातील वैभवशाली पायाभूत सुविधा म्हणून ओळखली जाते. गेल्या 18 वर्षांमध्ये या मेट्रोसेवेची लांबी 381 किलोमीटरने वाढविण्यात आली असून वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तो अधिकतर 120 किलोमीटर प्रतीतास असा झाला आहे. दिल्ली मेट्रोचे हे यश अत्यंत प्रेरणादायी असून ही सेवा भारताच्या शिरपेचातील मानाचा तुरा बनली आहे, अशी प्रतिक्रिया आहे.