नवी दिल्ली
कोविडच्या संकटानंतर आता काहीसे वाहन क्षेत्र सावरत असल्याची स्थिती आहे. सध्या उद्योग क्षेत्रात सकारात्मकता असल्यामुळे कार डिलर्सच्या चेहऱयावर हास्य आले आहे. या सणासुदीच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कार विक्रीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोठय़ा मागणीमुळे नवीन गाडय़ांची प्रतीक्षा एक वर्षांपर्यंत पोहोचली आहे, अशी परिस्थिती असल्यामुळे गाडी बुक करणाऱयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कार डीलर हर्षवर्धन बन्सल यांनी सांगितले की, ‘राजधानीत नवीन कारची मागणी झपाटय़ाने वाढत आहे. मात्र मागणीनुसार लोकांना गाडय़ा उपलब्ध होत नाहीत. कारण, देशातील सेमीकंडक्टर चिप्सची संख्या कमी झाली असून, त्याचा परिणाम कारच्या उत्पादनावर होत आहे.’
कोरोनापूर्वी सेमीकंडक्टरचा पुरवठा चीनमधून होत होता, मात्र आता तो युरोपमधून केला जात आहे. मात्र, केंद्र सरकार भारतात स्वतःची चिप तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्याचवेळी, आणखी एका कार डीलरने सांगितले की, दिल्लीतील सुमारे 60 टक्के वाहनधारकांना बराच वेळ प्रतीक्षेत राहावे लागते आहे.
चिपचे काय काम?
माहितीनुसार, ही चिप कारपासून ते डिजिटल घडय़ाळे आणि लॅपटॉपपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरली जाते. सेमीकंडक्टर चिप्सचा वापर कार इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर स्टीयरिंगसह अनेक भागांच्या कार्यप्रणालीसाठी केला जातो. नवीन वाहनांसाठी ही चिप अत्यंत महत्त्वाची आहे. ही एक छोटी चिप आहे जी कारमध्ये वापरली जाते.