वाहनधारकांसाठी धोकादायक, वारंवार घडताहेत अपघात
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर रोडवर विविध ठिकाणी वाहिन्या घालण्यासाठी चरी खोदून पाईप घालण्यात आल्या होत्या. मात्र हे काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याच्या दुतर्फा खोदण्यात आलेल्या चरी उघड्यावर आहेत. या चरी आता वाहनधारकांसाठी धोकादायक बनल्या असून या ठिकाणी अपघात होण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बसवेश्वर चौक ते तिसऱ्या रेल्वेगेटपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पण हे काम करण्यापूर्वी ठिकठिकाणी विविध वाहिन्या घालण्यासाठी सिमेंटच्या पाईप रस्त्यावर आडव्या घालण्यात येत आहेत.
या पाईप घालण्यासाठी चरी खोदण्यात आल्या होत्या. पण चरींचा धोका निर्माण झाल्याने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चरी बुजवून डांबरीकरण करण्यात आले होते. पण अलीकडे हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून गोवावेस येथील बसवेश्वर चौकात पाईप घालण्यासह 24 तास पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.