दिवाळीसाठी बाजारात खरेदीची लगबग : किराणा, खाद्यतेल-फराळ साहित्य दरात वाढ : दिवाळी सण चार दिवसांवर
प्रतिनिधी / बेळगाव
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठ दिवाळीच्या साहित्यांनी बहरताना दिसत आहे. शिवाय खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. दिवाळीत खमंग फराळाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे पोहे, फुटाणे, चिवडा, पोहे आणि शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, यंदा पोहय़ांच्या किमती किलोमागे 10 रुपयांनी वाढल्या आहेत. शेंगदाणे दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळीतील फराळासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
कोरोनाच्या संकटानंतर यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतर आता दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दिवाळीसाठी विविध साहित्य आणि खरेदीसाठी वर्दळ दिसून येत आहे. फराळासाठी विविध साहित्यांना मागणी वाढत आहे. कच्चे पोहे 50 रुपये किलो, भाजके पोहे 60 ते 70 रुपये किलो, फुटाणे 80 ते 90 रुपये किलो, शेंगदाणे 150 रुपये किलो असा दर आहे. तांदळाच्या किमती वाढल्याने पोहय़ांचा दर वाढला आहे. अतिवृष्टीमुळे भुईमूग पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईला तोंड देत दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
महागाईचा चटका
इंधन दरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. 15 किलोच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांनी तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे तयार फराळाचे दर वाढले आहेत. फराळाचे पदार्थ तयार करताना सर्वसामान्य गृहिणींना वाढत्या महागाईची झळ सोसावी लागत आहे. फराळाच्या प्रत्येक पदार्थामागे 25 ते 30 रुपयांची आणि किराणा दरात 20 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनानंतर आलेल्या पहिल्या दिवाळीसाठी महागाईचा चटका सहन करावा लागत आहे.
बाजारात अनारसे, चकली, कडबोळी, चिवडा, चिरोटे, करंजी आदी पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी उपपदार्थांना मागणी वाढली आहे. त्याबरोबर बाजारात तयार चकली, करंजी आणि चिवडादेखील उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या पदार्थांना मागणी वाढत आहे. त्याबरोबर मिठाईमध्ये काजू कत्तली, काजू रोल आणि इतर पदार्थांना पसंती दिली जात आहे. दोन वर्षांनंतर दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला असला तरी किराणा, खाद्यतेल आणि फराळाच्या साहित्यात वाढ झाली आहे.
दिवाळीसाठी पारंपरिक पद्धतीने चकली, करंजी, अनारसे आणि चिवडा करण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे पोहे, शेंगा, फुटाणे यांना मागणी वाढली आहे. त्याचबरोबर गुळालादेखील पसंती दिली जात आहे. 45 रुपये किलो दराने गूळ विकला जात आहे. पाडव्याला पुरणपोळी केली जाते. त्यामुळे किराणा बाजाराबरोबर गूळ खरेदीला पसंती दिली जात आहे. मागील दोन वर्षात सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत.
आकाश कंदील-दिवे खरेदीकडे कल
दिवाळीसाठी बाजारात खरेदीला उधाण येत असून किराणा बाजाराबरोबर रांगोळी, आकाश कंदील आणि पणती तसेच दिव्यांनाही मागणी वाढत आहे. विशेषतः आकर्षक आकाश कंदील आणि दिव्यांकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
शेंगदाण्याचे दर वाढले…
अतिवृष्टीमुळे भुईमूग पीक खराब झाले आहे. त्यामुळे शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर पोहय़ांच्या दरातही किलोमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा दिवाळीसाठी पोहे, शेंगा, फुटाण्यांची मागणी वाढली आहे. बेळगाव, चंदगड, खानापूर आणि गोवा येथून ग्राहक खरेदीसाठी येत आहेत.