जुनाट वृक्षांचा वाढतोय धोका : वनविभागाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
वळिवामुळे अनेक निकृष्ट झाडे कोसळली आहेत, तर काही ठिकाणी झाडे कोसळून मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले आहे. शहर परिसरात असणारी धोकादायक झाडे वनविभागाने पावसाळय़ापूर्वी हटविल्यास मोठे नुकसान टाळता येणार आहे. यावषी झाड कोसळून एका व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे हटविणे गरजेचे आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
यावर्षी वळीव पाऊस शहरासह परिसराला चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी वळिवाच्या दणक्मयाने अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर झाड कोसळून 10 ते 15 वाहनांचे नुकसान झाले होते. पावसाळय़ापूर्वी अशी जीर्ण झालेली झाडे हटवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावावर अनेक प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांवरच अनेक झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे या पावसामुळे रस्त्यांवर उन्मळून पडू लागली आहेत. अनेक घरांच्या भिंतीही कोसळण्याच्या घटना घडत असतात. कित्येकदा काही घरांवरील पत्रे आणि कौलेही उडून गेली आहेत. याचबरोबर झाडांच्या फांद्याही तुटून पडत आहेत. धोकादायक बनलेली काही झाडे रस्त्यांवर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे अशी जीर्ण झालेली झाडे हटविल्यास धोका टळू शकतो. शहर परिसरात वळिवाच्या जोरदार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबलेल्या काळी आमराई येथील एका व्यक्तीचा अंगावर झाडाची फांदी कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक दुचाकींचे नुकसानही झाले होते. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वनखात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही झाडे हटवण्यासाठी वनखात्याला विनंतीही केली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.