नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सेवाक्षेत्रातील कंपन्यांच्या उलाढालीत जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून आली आहे. 2011 पासूनची ही सर्वाधिक वाढ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सलग तिसऱया महिन्यात हा वाढीचा वेग दिसून आला असून अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे हे लक्षण असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
एस अँड पी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सेवा क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. याला काही प्रमाणात महागाई कारणीभूत आहे. महागाईमुळे सेवा क्षेत्रातील कंपन्यांना गुंतवणुकीचा खर्च अधिक प्रमाणात करावा लागतो. हा खर्च या कंपन्या ग्राहकांवर काही प्रमाणात टाकतात. त्यामुळे सेवा महाग झाल्या आहेत. परिणामी सेवा क्षेत्रातील कंपन्यांची उलाढाल वाढलेली आहे. मात्र हे एकमेव कारण नाही. मागणीत झालेली वाढ हे मुख्य कारण असल्याचा या संस्थेचा निष्कर्ष आहे.
सेवा क्षेत्राचा विस्तार
गेल्या दोन वर्षांमध्ये सेवा क्षेत्राचा चौफेर विस्तार झाला असून मध्यम वर्ग आणि उच्च तसेच श्रीमंत वर्गातील लोकांची क्रय शक्ती (खर्च करण्याची शक्ती) वाढलेली दिसून येते. त्यामुळे या घटकातील लोक अधिक खर्च करीत आहेत. परिणामी सेवा क्षेत्राचा विकास होण्यास साहाय्य मिळत आहे. पीएमआय (पर्चेस मॅनेजर्स इंडेक्स) अनुसार सेवा कंपन्यांनी आता नेहमीपेक्षा अधिक कच्च्या मालाची नोंदणी करण्यास प्रारंभ केला असून याचाच अर्थ सेवाक्षेत्रात मागणी वाढली असा होते. उत्पादन क्षेत्राचा पीएमआय मात्र जूनमध्ये घसरला आहे. मे मध्ये तो 54.6 इतका होता. तो जूनमध्ये 53.9 पर्यंत घसरला.
रोजगारांमध्ये वाढ
सेवाक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र या दोन्हींमध्ये खासगी क्षेत्रात रोजगारांमध्ये वाढ दिसून आली. ही वाढ लक्षणीय नसली तरी समाधानकारक असल्याचे बोलले जाते. निवृत्ती वेतन निधीत अधिक कर्मचाऱयांनी नावे नोंदविली आहेत. यावरुन रोजगार निर्मितीत वाढ होत असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.