तालुका म. ए. समितीचे हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर /किणये
वाघवडे, संतिबस्तवाड भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज विद्युतपुरवठा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन या परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने हेस्कॉमच्या ग्रामीण मुख्य कार्यालयात सोमवारी देण्यात आले. रात्रीच्यावेळी विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. या निवेदनाचा विचार करून विद्युतपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
संतिबस्तवाड, वाघवडे, झाडशहापूर, कर्ले, किणये, बाळगमट्टी व मच्छे या भागात सायंकाळी 6 वाजता सिंगल फेज विद्युतपुरवठा सुरू केला जातो. मात्र, केवळ अर्ध्या तासातच हा पुरवठा बंद केला जात आहे. यामुळे शेतशिवारात घर बांधून राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा अधिक त्रास होऊ लागला आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
काही शेतकरी आपल्या गावाबाहेरील शेतात घर बांधून स्थायिक झालेले आहेत. त्यांना विद्युतपुरवठा नसल्याने अंधारातच रहावे लागत आहे. तसेच शेतीला जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म काही शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना उजेडाशिवाय खाद्य खाता येत नाही. अंधारामुळे या पक्ष्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली आहे.शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांची जनावरेही आहेत. या जनावरांची देखरेख करणे अवघड झाले आहे. तसेच रात्रीच्यावेळी अंधार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण बनले आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाघवडे, संतिबस्तवाड भागात ऊसतोडणीसाठी महाराष्ट्रातील काही ऊसतोडणी मजूर येत आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी सिंगल फेज विद्युतपुरवठा नसल्यामुळे अंधारात रहावे लागत असल्याने ऊसतोड मजूरही या भागात पाठ फिरवू लागले आहेत.
या सर्व समस्या दूर करण्यासाठी हेस्कॉमने या भागात रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीजपुरवठा करण्यात यावा. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदींसह वाघवडे गावातील भावकाण्णा पाटील, आर. के. पाटील, जोतिबा आंबोळकर, संतोष आंबोळकर, सुभाष देसाई, पुंडलिक नाईक, महादेव बिर्जे, दयानंद देसाई, राजू दिवटगे, नागेश आंबोळकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.