विश्व शांती मानवाधिकार मिशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान घेणे हे धोकादायक आहे. त्यामुळे मतपत्रिकेद्वारेच मतदान घ्यावे आणि लोकशाही बळकट करावी, अशी मागणी विश्व शांती मानवाधिकार मिशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. मात्र मतपत्रिकेद्वारेच मतदान घेतले तर योग्य उमेदवाराला मतदान होते. अन्यथा ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान केले तर ते चुकीच्या व्यक्तीला होत आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
भारत स्वतंत्र झाल्यापासून मतपत्रिकेद्वारेच मतदान घेतले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेतले जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा चुकीचा लागत आहे.
तेव्हा मतपत्रिकेद्वारेच मतदान घ्यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मानवाधिकार मिशनचे अध्यक्ष इरफान शेखअली, उपाध्यक्ष दत्ता बिलावर, शाहुराज लोहार, वीरेश हिरेमठ, अॅड. आनंद करोशी, शशिकला देवेंद्र अळगुंडीकर, दीपक कोरडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच मोर्चा
मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, यासाठी सध्या निवेदन देण्यात आले आहे. मात्र लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये बेळगावच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष इरफान शेखअली यांनी केले आहे.