फळे, फुलांची आवक, खरेदीची लगबग
प्रतिनिधी / बेळगाव
श्रावणमासाला प्रारंभ झाल्याने बाजारात फळे, हार आणि फुलांना मागणी वाढली आहे. विशेषतः गुरुवार, शुकवार फळे, हार आणि फुलांची विक्री अधिक होत आहे. श्रावणमासानिमित्त पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिवाय दर सोमवारी शिवालयांतून दर्शनासाठी वर्दळ वाढत आहे. त्यामुळे बाजारात पूजेच्या साहित्याला मागणी वाढली आहे.
श्रावणमासानिमित्त फळे, हार, फुले, नारळ, केळी, पाने, आंबोत्या आदी पूजेच्या साहित्याची रेलचेल असलेली पाहायला मिळत आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य करून उपवास करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. सफरचंद 100 ते 240 रु. किलो, पेरू 80 ते 100 रु. किलो, डाळिंब 60 ते 160 रु. किलो, संत्री 280 रु. किलो, पपई 20 ते 60 रुपये नग, मोसंबी 60 ते 80 रु. किलो, केळी 50 ते 70 रुपये किलो, अननस 40 ते 60 रुपये नग या प्रमाणे फळांचे दर आहेत. गतवर्षी श्रावणमास कोरोनातच गेला होता. त्यामुळे सर्वत्र निर्बंध होते. मात्र यंदा श्रावण मासानिमित्त बाजारपेठ बहरली आहे. त्यामुळे विविध साहित्य खरेदीसाठी उधाण आले आहे. बाजारात विविध फळांची आवकदेखील वाढली आहे. मात्र, फळांचा दर अधिक असल्याने सर्वसामान्यांना खरेदी करणे कठीण जात आहे. फळांबरोबर लिंबू, अगरबत्ती, कापूर आदी पूजेच्या साहित्यालाही भाविकांतून मागणी वाढत आहे.