जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही यांना निवेदन : महिलांचा मोठा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
रोहयोंतर्गत वर्षाला किमान 100 दिवस काम द्यावे. कामगार घेऊन येत असलेल्या साहित्याच्या भाडय़ात वाढ करावी, वेळेत वेतन द्यावे, या मागणीसाठी दिल्ली येथे देशातील विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून येथील मजदूर नवनिर्माण संघटनेच्यावतीने जिल्हा पंचायतसमोर धरणे आंदोलन छेडून निवेदन देण्यात आले.
रोहयोंतर्गत जे कामगार काम करत आहेत, त्यांना बांधकाम व इतर कामगारांप्रमाणे सुविधा द्याव्यात, लेबरकार्ड द्यावे. कामगारांप्रमाणे इतर सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. बऱयाच ग्राम पंचायत कामगारांना 100 दिवस काम नाही. त्यामुळे त्या परिसरातील कामगारांवर अन्याय होत आहे. तेव्हा 100 दिवस काम दिलेच पाहिजे, ग्रुप लीडर आहेत, त्यांचीही नोंद करावी. आपल्या मागण्या मान्य केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी कागणीकर, राहुल पाटील, कविता मुरकुप्पी, बसवंत कोले, अडव्याप्पा कुंबरगी, यल्लाप्पा गस्ती, शांता कुरबर, विठ्ठल देसाई, लक्ष्मी कुंडेकर, हर्षल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पद्मप्रसाद हुली यांच्यासह कामगार महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.