ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाकडून ‘चलो नबन्ना’ मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. याच नबन्ना मोर्चात सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमधील भाजपाचे कार्यकर्ते कोलकात्याच्या दिशेने जात आहेत. तर भाजपच्या (BJP) आंदोलनादरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. कोलकात्याच्या रस्त्यावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी भाजपचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. तर पोलिसांनी आंदोलनादरम्यान भाजप नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) आणि अन्य भाजप नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी भाजपच्या तीन मोठ्या नेत्यांनी कोलकात्यात तीन वेगवेगळ्या भागात निदर्शने केली. प्रदेश भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार (Sukant Majumdar) यांनी हावडा येथे, दिलीप घोष (Dilip Ghosh) सियालदह येथे तर सुवेंदू अधिकारी यांनी संत्रागाछी येथे निदर्शने केली. हावडा येथे पोलिसांच्या कारवाईदरम्यान भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या वापर केला.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आणि भ्रष्टाचाराविरोधात ‘नबन्ना चलो मोर्चा’चे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना मंगळवारी (१३ सप्टेंबर) कोलकात्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यातील भाजपाचे कार्यकर्ते हातात भाजपाचा झेंडा घेऊन कोलकात्याच्या दिशेने निघाले आहेत. मात्र मोर्चाला परवानगी नसल्यामुळे कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी अडवले जात आहे. याच कारणामुळे राणीगंज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोलकात्याला जाण्यापासून रोखले. मात्र भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.