भारत निवडणूक आयोगाकडून राजकिय पक्षांना निमंत्रण; स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणालीची तयारी सुरु
कोल्हापूर प्रतिनिधी
देशांतर्गत स्थलांतरित मतदारांना मतदान करता यावे, यासाठी दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर या मतदान यंत्राची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांना सोमवारी (दि.16)निमंत्रित केले आहे, अशी माहिती संयुक्त संचालक (माध्यमे) अनुज चांडक यांनी बुधवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
सर्वांना विश्वासार्ह व मान्य होईल अशा तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे व अरुण गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाने दूरस्थ मतदान केंद्रांवर ‘एम-3’ प्रारुपाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या सुधारित आवृत्तीचा उपयोग करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी त्यांची नोंदणी असलेल्या जिह्यात जाऊन मतदान करण्याची गरज राहणार नाही.
दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे एकाच दूरस्थ मतदान केंद्रावरुन अनेक मतदारसंघातील मतदान हाताळता येणार आहे. याबाबतच्या कायदेशीर, परीचालानात्मक, प्रशासकीय व तंत्रज्ञान विषयक आव्हानांबाबत भारतीय निवडणूक आयोगाने संकल्पना दस्तऐवज तयार केला आहे. या मतदान यंत्राच्या नमुन्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मान्यताप्राप्त 8 राष्ट्रीय व 57 प्रादेशिक राजकीय पक्षांना सोमवारी (दि.16) निमंत्रित केले आहे. प्रात्यक्षिकाच्या वेळेस तांत्रिक तज्ञ समितीचे सभासदही उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे स्थलांतरित मतदारांना दूरस्थ स्वरुपाच्या मतदानासाठी निवडणूक विषयक कायद्यात, प्रशासकीय प्रक्रियेत व मतदानाच्या पद्धतीत, तंत्रज्ञानात करावे लागणारे बदल आदी विविध मुद्यांबाबत राजकीय पक्षांनी लिखित अभिप्राय दि.31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यानुसार राजकिय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन चांडक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.