गदारोळामुळे संसद दिवसभरासाठी स्थगित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, या आपल्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा संसदेचे कामकाज बंद पाडले आहे. प्रचंड घोषणाबाजी, गदारोळ आणि गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. केंद्र सरकारचा लोकशाहीलाच विरोध आहे. विरोधी पक्षांना लोकशाहीच्या मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे. अदानी प्रकरणी केंद्र सरकारने लवकरात लवकर संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी. अन्यथा संसदेतील गोंधळ थांबणार नाही, असा इशारा काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. निदर्शने करताना विरोधकांनी केंद्र सरकार डाऊन डाऊन, केंद्र सरकार शेम शेम अशा घोषणा दिल्या. भाजपने या वर्तणुकीचा निषेध केला आहे.
गांधींनी क्षमायाचना करावी
राहुल गांधीनी विदेशी भूमीवर देशाच्या लोकशाहीची अवमानना केली आहे. त्यांनी अन्य देशांना भारतात हस्तक्षेप करण्यास प्रोत्साहन दिले आहे. ही त्यांची कृती अत्यंत गंभीर असून त्यांनी त्वरित देशाची क्षमायाचना करावी. राहुल गांधी यांनी विनाकारण वाद निर्माण केला आहे. जो पर्यंत ते क्षमा मागणार नाहीत, तोपर्यंत संसदेत त्यांना जाब विचारण्यात येईल, असे प्रतिआव्हान भाजपनेही दिले.
आतापर्यंत कामकाज नाही
अर्थसंकल्पीय अधिकवेशनाचे दुसरे सत्र 13 मार्चपासून सुरु झाले आहे. ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र आतापर्यंत या दुसऱया सत्रात एक दिवसही संसदेचे कामकाज झालेले नाही. अदानी प्रकरणातील मागणीवर काँगेस अडून बसली आहे, तर राहुल गांधींच्या क्षमायाचनेची मागणी भाजपने लावून धरली आहे.
राज्यसभा अध्यक्षांची बैठक
राज्यसभेचे अध्यक्ष आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. राज्यसभेत कामकाज कसे सुरळीत होईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. या सत्रातील ही अशा प्रकारची दुसरी बैठक आहे. या बैठकीवर बहुतेक विरोधी पक्षांनीं बहिष्कार टाकला होता.