संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. आज पहाटे पारंपरिक पद्धतीनं वैकुंठ स्थान या ठिकाणी पूजा करण्यात आली. त्यांनतर सकाळी रामनाना मोरे महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी पारंपरिक पद्धतीनं देऊळवाड्यात तुकोबांच्या पादुका आणल्या जातील. त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.
मागील दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे पायी वारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता, त्यामुळे तुकोबांच्या पादुका राज्य परिवहन मंडळाच्या बस मधून पंढरपूरला नेण्यात आल्या. त्यानंतर आज दोन वर्षानंतर हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं पायी वारी सोहळा होत आहे. त्यामुळे वारकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.