अध्याय पंधरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, सत्वगुण संपन्न माणसाला माझे ध्यान करून माझे स्वरूप प्राप्त होते. सर्वांवर जशी माझी आज्ञा चालते, त्याप्रमाणे त्याची आज्ञाही सर्व चराचरावर चालते. त्या आज्ञेचे कोणी तिळभरसुद्धा उलंघन करीत नाही. अशी खरी ‘आज्ञासिद्धी’ त्याला प्राप्त होते. आता क्षुद्र अशा ज्या पाच सिद्धी, त्याही तुला मी सांगतो. त्यातली पहिली म्हणजे माझी धारणा करत करत ज्याचे चित्त माझ्या भक्तीने शुद्ध झाले असेल, त्याला जन्ममृत्यूसह तिन्ही काळातील सर्व गोष्टी समजतात. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही माझ्याच आधीन आहेत. माझे भजन केले असता अंतःकरण अत्यंत शुद्ध होते. त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणांत भूत, भविष्य व वर्तमान, आणि जगाचे जन्म व मरण यांचे त्रिकालज्ञान होण्याची सिद्धी प्राप्त होते.
पाण्यात राहणाऱया प्राण्यांचा पाण्याकडून नाश होत नाही, त्याचप्रमाणे ज्या योग्याचे चित्त माझ्यामध्ये स्थिर झाले आहे, त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. चित्ताने अत्यंत कष्ट करावे, तेव्हा त्याचा माझ्याशी योग होतो. चित्ताचा माझ्याशी योग झाला म्हणजे शरीरही योगयुक्त होते आणि त्या शरीराला मोठमोठय़ा द्वंद्वांपासूनही बाधा होत नाही. त्याला थंडी किंवा उन्हाळा, मऊ किंवा कठीण, यांची बाधा होत नाही. त्याच्या देहाला अग्नी लागला तरीसुद्धा त्याचा देह जळत नाही ! जळात जशी जलचरे खुशाल राहतात, त्याप्रमाणे तो अग्नीतही खुशाल विश्रांती घेत राहतो. अशी ‘अद्वंद्वता’ नामक सिद्धी साधकाला प्राप्त होते. ह्याच सिद्धीच्या धारणेने ‘प्रतिष्टंभ’ सिद्धी उत्पन्न होते. सर्व बाधांपासून मुक्त करण्याविषयीच्या ब्रीदाचे तोडर जिनं पायात घातले आहेत, अशा त्या ‘प्रतिष्टंभ’ सिद्धीचे लक्षणही ऐक. त्याला बाहेरच्या वायूच्या सोसाटय़ाने पीडा होते असे कधी घडत नाही. तो प्राणालाही जिंकून त्याला आत बटकीप्रमाणे करून ठेवतो. देठे काढून टाकलेल्या फुलांच्या शय्येवर ज्याप्रमाणे सुखाने निजावे, त्याप्रमाणे तो जळजळीत निखाऱयावर निजतो. त्याला त्या अग्नीची पीडा होत नाही. थंडीच्या दिवसात मौजेने गार पाण्यात नेऊन सिद्धाला बुडविले असताही तो बाहेर निघण्याकरिता कधीच तळमळत नाही. पाण्यात मासा जसा खेळत असतो, त्याप्रमाणे तो खुशाल क्रीडा करीत असतो किंवा ग्रीष्मऋतूतील रखरखीत ऊन असते त्यात सिद्धाला ठेवले असताही सूर्यकिरणांनी कमल जसे प्रफुल्लीत होते, त्याप्रमाणे त्याला ऊन लागले असता तो अधिकच टवटवीत होतो. ह्याप्रमाणे सूर्याचा तापही त्याला मुळीच बाधत नाही. त्याचप्रमाणे सिद्धाला शस्त्राचे घाव लागले असताही तो शस्त्रापासून पीडा पावत नाही. शस्त्राने आकाशावर घाव घालू लागले असता तो घावच फुकट जातो, त्याप्रमाणे सिद्धालाही शस्त्राचे घाव लागत नाहीत. शस्त्राचे सारे उपाय निष्फळ होतात. सिद्धाला विष दिले असता ते विषसुद्धा त्याला बाधक होत नाही. ज्याप्रमाणे विषातील किडे विषात सुखाने नांदतात, त्याप्रमाणे तोही सुखाने राहतो. छाया पर्वताच्या खाली दडपली असता ती जशी त्याला खुपत नाही, त्याप्रमाणेच अग्नी, सूर्य, विष, पाणी किंवा वारा यापैकी काहीच सिद्धाला कधी बाधत नाही. माझे स्वरूप शुद्ध असून अद्वैत आहे. त्यात सिद्धीचे जे मनोरथ असतात, ते सर्व केवळ लोकरंजनाकरिता आहेत. सिद्धींमध्ये कांही परमार्थ नाही.
मगाशी ‘परचित्ताभिज्ञता’ या नावाची एक सिद्धी ध्वनितार्थाने सांगितली.
ह्या सिद्धीच्या गोष्टी ऐकून मनाला जरी मोठा उल्हास वाटला, तरी माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धी या सर्वस्वी बाधक आहेत. अशा ईश्वराचे ध्यान केले असता चित्ताची चालकताच त्याला प्राप्त होते. त्यामुळे चित्ताचे जाणतेपण असते ते त्याला सहजच साध्य होते. जो जो संकल्प त्याच्या चित्तात चालतो, तो तो ह्याला कळत असतो. त्याच्या अंतःकरणांतील जी अगदी गुप्त आवड असेल, तिच्यासंबंधीच्या गोष्टी हा सहज सांगू शकतो. एवढी ह्या सिद्धीची महती त्याला तत्काळ साध्य होते.
क्रमशः