आरोग्य क्षेत्राकरता अर्थसंकल्पात मोठय़ा घोषणा ः नवी वैद्यकीय यंत्रसामग्री आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट करणार
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद तसेच अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरला आहे. या अर्थसंकल्पात देशाचे आरोग्य सुधारण्याचा निर्धार करत नवे कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मेडिकल कॉलेज लॅबची व्यवस्था
आरोग्याच्या क्षेत्रात अनेक सुधारणांची गरज असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. याकरता त्यांनी नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक प्रयोगशाळांची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून नवी यंत्रे आणली जाणार आहेत, याद्वारे देशातच मोठय़ातील मोठय़ा आजारावर यशस्वी उपचार मिळवून देण्याची व्यवस्था सरकार करू पाहत आहे. मुख्य ठिकाणी 157 नव्या नर्सिंग कॉलेज स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
2047 पर्यंत ऍनिमियाचे उच्चाटन
2023 च्या अर्थसंकल्पात 2027 पर्यंत ऍनिमिया (रक्तक्षय) या आजाराचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ऍनिमियामुळे देशात दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. ऍनिमिया आणि मुलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱया आजारावरून अनेक कार्यक्रम सरकार हाती घेणार आहे. 2047 पर्यंत हे आजार पूर्णपणे दूर करण्याचा निश्चय सरकारने घेतला आहे. ऍनिमिया भारतात अनेक वर्षांपासून गंभीर आरोग्य समस्या राहिली आहे. महिलांमध्ये याचा धोका अधिक दिसून येतो. एका अहवालानुसार 15-49 वयोगटातील देशाच्या 57 टक्के महिला आणि 25 टक्के पुरुषांना ऍनिमियाची समस्या आहे. 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 46 टक्के मुली ऍनिमियाने ग्रस्त आहेत. थकवा, लक्ष केंद्रीत करण्यास त्रास होणे इत्यादी याची लक्षणे आहेत. विविध वयोगटात याची स्थिती देखील वेगवेगळी आहे. कमी वयोगटात याचे रुग्ण अधिक असतात. देशातील मोठय़ा प्रमाणात युवा लोकसंख्या या आजाराने ग्रस्त असणे चिंतेचा विषय आहे.
स्वच्छ पाणी, अन्नावर भर
या अर्थसंकल्पात एका व्यक्तीला स्वच्छ पाणी आणि अन्न अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याचमुळे अर्थसंकल्पात याकरता प्राथमिकता देण्यात आली आहे. सरकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत तज्ञांकरता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रयोगशाळा संशोधनासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. याद्वारे वैद्यकीय क्षेत्रासाठीचे संशोधन तसेच नवोन्मेषी तंत्रज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मॅनहोलमध्ये यंत्रांचा वापर
मोदी सरकारने मॅनहोलसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. या अर्थसंकल्पात आता मॅनहोमध्ये माणूस उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मॅनहोलमध्ये माणसांकडून काम करवून घेण्याऐवजी आता यंत्रांचा वापर सर्वत्र करण्यात येणार आहे. मॅनहोलमध्ये गुदमरून कित्येक स्वच्छता कर्मचाऱयांचा होणारा मृत्यू पाहता ही घोषणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच स्थानिक स्तरावर साफसफाईच्या कामात यंत्रांचा वापर वाढल्याने नागरिकांना एकप्रकारे दिलासाच मिळणार आहे.
220 कोटी डोस
कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी सरकारने आतापर्यंत 220 कोटी डोस लोकांना दिले असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दिली आहे. लसीकरणामुळे कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.
फार्मामध्ये संशोधनासाठी कार्यक्रम
औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. देशांतर्गत औषधनिर्मिती क्षेत्राने नवोन्मेष तसेच संशोधन-विकास क्षेत्राला चालना देण्यासाठी निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पावले उचलण्यात आली आहेत.