तालुका म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
लोकशाहीमार्गाने आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही मोर्चा काढत आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वत्र जनजागृती केली जात आहे. तरीदेखील सर्वांनी अत्यंत जागरुकतेने राहून आपल्या हक्कांसाठी हा मोर्चा काढायचा आहे. तेव्हा प्रत्येक मराठी भाषिकाने या मोर्चामध्ये आपला सहभाग दर्शवावा आणि मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. ओरिएंटल शाळेच्या सभागृहात ही बैठक झाली.
मराठीतून परिपत्रके द्यावीत, शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व फलक तिन्ही भाषांमध्ये उभे करावेत, सरकारी कार्यालयांमध्येदेखील तिन्ही भाषांमध्ये फलक लावावेत, यासाठी हा मोर्चा काढायचा आहे. सीमाभागामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिक असून कायद्यानुसारच ही कागदपत्रे उपलब्ध केली पाहिजेत. मात्र सरकार त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
त्यासाठी मराठी भाषिकांनी एकजुटीने राहून हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केले.
सध्या प्रत्येक गावामध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतल्या जात आहेत. तरुणांचा तसेच मराठी भाषिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 27 जून रोजी हा मोर्चा काढायचा असून प्रत्येकाने या मोर्चामध्ये आपला सहभाग दर्शवावा, असे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, राजाभाऊ पाटील, मनोज पावशे, प्रकाश अष्टेकर, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, संतोष मंडलिक यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी एस. एल. चौगुले, बी. डी. मोहनगेकर, दुद्दाप्पा बागेवाडी, परशराम घाडी, रमेश मेणसे, रामचंद्र मोदगेकर, शांताराम कुगजी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.