पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती : किनारपट्टी भागातील आमदारांची बैठक
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात दर्जेदार पर्यटक यावेत म्हणून आवश्यक त्या सुखसोयी, सुविधा देण्याची गरज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली असून समुद्रकिनारा व्यवस्थापन धोरण आखण्यावरही त्यांनी भर दिला आहे. किनाऱयावरील प्रश्न सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले असून किनारी भागातील पर्यटनासाठी आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे.
पर्यटन भवन, पणजी येथे किनारपट्टी भागातील आमदारांची त्यांनी बैठक घेतली आणि पर्यटन विकास वाढीसाठी काय करता येईल यावर चर्चा केली. आमदारांनी पर्यटनाशी संबंधित अनेक तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांची दखल घेऊन योग्य त्या कार्यवाहीची मागणी केली. सर्व आमदारांनी, पंचायतींनी त्या तक्रारी सोडविण्यासाठी सहकार्य देण्याचे आवाहन खंवटे यांनी केले. किनारी भागातील 10 आमदार या बैठकीस उपस्थित होते आणि खंवटे यांनी तिचे अध्यक्षस्थान भूषविले.
किनारा व्यवस्थापन धोरण हवे
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खंवटे म्हणाले की, समुद्रकिनाऱयांची स्वच्छता महत्त्वाची असून त्यासाठी किनारा व्यवस्थापन धोरण आखणे आवश्यक आहे. ते केल्याशिवाय किनाऱयावरील प्रश्न सुटणार नाहीत.
पर्यटन सुरक्षा दल वाढवण्याची गरज
पर्यटकांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि पर्यटक सुरक्षा दल कमी पडत असल्याचे त्यांनी कबूल केले. ते दल वाढवणे हिताचे असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून दलाची क्षमता वाढवणार असल्याची ग्वाही खंवटे यांनी दिली. आमदारांनी त्यासाठी सूचना, कल्पना देऊन पर्यटन विकास वाढी करीता हातभार लावावा, असे निवेदन त्यांनी केले. पोलिसांनी व इतर संबंधित खात्यांनी या कामी मदत करावी, असेही त्यांनी नमूद केले.
बीच संस्कृती-सेवा सुविधांसाठी तीन किनाऱयांची निवड
‘बीच संस्कृती – सेवा सुविधा’ यासाठी दक्षिण गोव्यातील बाणावली तर उत्तर गोव्यातील मोरजी व मिरामार अशा एकूण तीन किनाऱयांची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. किनाऱयावरील अतिक्रमणे, बेकायदा गोष्टी रोखणे महत्त्वाचे असून त्यासाठी सीसीटिव्हीसह किनारी व्यवस्थापन धोरण आखणार असल्याचे ते म्हणाले.