ऑनलाईन टीम/तरुण भारत
Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या गटाने उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल (Muraji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली होती. राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले असून आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू, असे ते म्हणाले.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अंधेरी पूर्व निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांची भेट घेतली होती अशी माहितीसुद्धा फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचं समर्थन करावं अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
हे ही वाचा : Andheri East bypoll : ‘भाजपने उमेदवार मागे घ्यावा’, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले आहे. आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू. यापूर्वीही आर.आर. पाटील यांच्या वेळेसची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असताना मला पक्षात चर्चा करावी लागेल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल”, असेही ते म्हणाले.