ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्रातील 18 पगड जातीचं ओबीसी आरक्षण गेलं होतं, ते परत मिळवून देण्याचा काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं. पुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या मागे उभे राहण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. बावनकुळे यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
नागपुरात श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात. ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्याय फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. 2014 ते 2019 चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात, असेही बावनकुळे म्हणाले.
अधिक वाचा : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्रसाद लाड यांना क्लीन चिट
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंतच टिकेल,असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्याने मुख्यमंत्री शिंदेंची खुर्ची धोक्यात आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.