कांदा-बटाटा, भाजीपाल्यांचे दर स्थिर ः टोमॅटोत किंचित वाढ
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटा दर स्थिर होते. भाजी मार्केटमध्ये मोजक्याच भाजीपाला दरात वाढ झाली. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. ढबू मिरची महाराष्ट्रातील कराड येथून तर बिन्स बेंगळूर भाजी मार्केटमधून मागविण्यात येत आहे. टोमॅटो ट्रेच्या दरात थोडय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
सध्या महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये जोरदार पाऊस होत असल्याने कांदा नरम होत आहे. हलक्या प्रतीचा कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्रातील बाजारपेठ बंद होती. दि. 12 ऑगस्ट रोजी बाजार सुरू झाले. यामुळे महाराष्ट्रातील नाशिक बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. तसेच दुबई, अरब राष्ट्रे, मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रांमध्ये निर्यात होणाऱया कांद्याला मागणी जास्त आहे. त्याचप्रमाणे बांगला देशामध्ये मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. भारतातून या राष्ट्रांमध्ये कांदा निर्यात करण्यात येतो. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा राज्यांमध्ये नाशिकमधून कांदा पाठविला जातो. परदेशात निर्यात होणाऱया कांद्यामध्ये भारत सरकारने कपात केली आहे. यामुळे यंदा कांद्याचा भाव वाढला नसल्याची माहिती कांदा अडत व्यापाऱयांनी दिली.
बटाटा लागवड खराब
अतिवृष्टीच्या दमदार पावसामुळे हासन, केरळ, उडुपी आणि देशाच्या दक्षिण राज्यांमध्ये बटाटा पिके खराब झाली आहेत. यंदा बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यांमध्ये बटाटा लागवड निम्म्याप्रमाणात झाली आहे. यामुळे इंदूर-आग्रा बटाटय़ावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. इंदूर बटाटा शीतगृहांमध्ये मोठय़ा प्रमाणात साठवून ठेवला आहे. त्यांच्या मर्जीप्रमाणे भाव मिळणाऱया बाजार पेठेमध्ये इंदूर बटाटा विक्रीसाठी पाठवत आहेत. यामुळे पुढील महिन्यामध्ये बटाटा दरात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
भाजीपाला दर टिकून
दमदार पावसामुळे बेळगाव जिल्हय़ातील भाजीपाला शेतामध्येच खराब झाला आहे. वास्तविक दरवर्षी पावसाळय़ात भाजीपाल्याचे दर कोसळलेले असतात. भाजीला मागणीच नसते. मात्र, यंदा भाजीपाला खराब झाल्यामुळे आवकही जेमतेम आहे आणि दरही टिकून आहे. श्रावण मासानिमित्त गोवा, कोकण पट्टय़ासह बेळगावमधून भाजीपाला मागणी जास्त आहे.