ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच शिंदे आणि भाजपने मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा करत नवीन सरकार सत्तेत आणलं. राज्यपालांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (New CM Eknath Shinde) म्हणून शपथ घेतील असे म्हणत सर्वांना धक्का दिला. यांनतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, फडणवीस पुन्हा सत्तेत येताच राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मध्यरात्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे.
नवीन सरकार सत्तेत येताच आणि फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मध्यरात्री राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. याभेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अचानक धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर स्पष्टीकरण दिल आहे. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यसाठी मुंडे सागर बंगल्यावर गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का, या भेटीत उद्याच्या राजकारणाची काही बीजे रोवली गेली आहेत का हे येणाऱ्या काळात कळेल.