हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तोंडावाटे घेतले जाऊ शकणारे इन्शुलिन तयार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे येत्या तीन-चार वर्षांत इन्शुलिनचे इंजेक्शन घेण्यापासून मधुमेहींना सुटका मिळणार आहे. या विद्यार्थ्यांनी पी.के.-2 नामक औषधाचा एक रेणू तयार केला असून तो पचनसंस्थेद्वारा रक्तात मिसळू शकतो. या औषधाचा इन्शुलिन तयार करणाऱया स्वादुपिंडावर चांगला परिणाम होतो. यामुळे स्वादुपिंडाची इन्शुलिन निर्मितीची क्षमता वाढते आणि मधुमेहींना नैसर्गिक इन्शुलिनची प्राप्ती होते. इंजेक्शन टोचून दिलेले कृत्रिम इन्शुलिन कितीही उच्च गुणवत्तेचे असले तरी ते मानवी इन्शुलिनची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा इन्शुलिनवर अवलंबून असणाऱया मधुमेहींच्या प्रकृतीवर कालांतराने विपरित परिणाम घडताना दिसून येतो.
मात्र, या संशोधकांनी शोधलेल्या औषधाच्या रेणुमुळे स्वादुपिंडाचीच क्षमता वाढणार असून इन्शुलिन निर्मितीतील अडथळे नैसर्गिकरीतीने दूर होणार आहेत. त्यामुळे टाईप-2 मधुमेह असणाऱया रुग्णांसाठी हे औषध वरदान ठरणार असल्याचे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. हे संशोधन अद्याप व्यापारी उत्पादनाच्या पातळीपर्यंत पोहोचलेले नसले तरी त्याच्या मानवी शरीरावरच्या चाचणी अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी ठरल्या आहेत. आता या औषधाचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न हे संशोधक विद्यार्थी करीत आहेत. या औषधामुळे स्वादुपिंडांमध्ये बिटा सेल्सचे प्रमाण वाढते. परिणामी अधिक इन्शुलिन निर्माण होते. बायोलॉजिकल केमिस्ट्री या नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. प्राध्यापक प्रसोनजित मंडल, प्रा. सुब्रत घोष, डॉ. सुनीलकुमार, डॉ. बुधेश्वर, शिल्पा ठाकुर, ख्याती गिरिधर, सुरभी डोगरा इत्यादींनी हे संशोधन तडीस नेले आहे.