आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका
प्रतिनिधी /पणजी
मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना काँग्रेस कार्यकारी समितीच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन हटविण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कामत तसेच मायकल लोबो यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सदर कारवाई केल्याचे पक्षीय सूत्रांनी सांगितले. लोबो यांच्यावरही अशा प्रकारे कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले तर आधीचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना काँग्रेस अखिल भारतीय कार्यकारी समितीवर कायमस्वरुपी सदस्य म्हणून घेण्यात आले होते. हे सर्व झाल्यानंतर पावसाळी विधानसभा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या 8 आमदारांनी फुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे नेतृत्व कामत व लोबो यांनी केले होते, असा उघड आरोप राव यांनी केला होता तसेच दोघांवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटविण्यात आल्याचे राव यांनी तोंडी सांगितले होते तथापि तसे अधिकृत पत्र अद्यापही जारी करण्यात आलेले नाही. कामत यांना काँग्रेस कार्यकारी समितीतून हटविण्यात आल्याचे अधिकृत पत्र राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी जारी केले आहे. लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटविल्याचे अधिकृत पत्र लवकरच जारी होणार असल्याचे पक्षीय सूत्रांनी नमूद केले.
आपल्याला त्याचे ‘ना सोयर ना सुतक’ : कामत
आपल्याला विचारात न घेताच काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावरील एका समितीवर आपणास नियुक्त केले होते. मात्र आपण कधीही त्या बैठकीला उपस्थित राहिलेलो नव्हतो. त्या समितीवरती नियुक्ती केली याबद्दल आपल्याला फार आनंदही नव्हता. त्यामुळे आता त्यांनीच आपल्याला त्या समितीवरून काढले असल्याने आपल्याला त्याचे ना सोयर ना सुतक! अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे बंडखोर आमदार दिगंबर कामत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
दैनिक तरुण भारतशी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की गेल्या पाच वर्षात आपल्याला भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेकांनी जोरदार आग्रह धरला, परंतु आपण पक्षाशी एकनि÷ राहिलो आणि त्या एकनि÷ राहिल्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला काँग्रेस पक्षाने ही वागणूक दिलेली आहे. सारी जनता हे पाहत आहे. काँग्रेसची आज देशभरात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे व अनेक महत्त्वाचे नेते पक्षापासून दूर जात आहेत, याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे होता. काँग्रेस पक्ष आपल्या विचारांपासून दूर भटकत आहे आणि त्याचे परिणाम काय होतील हे पक्षातील नेत्यांना माहीत नाही, असेही कामत म्हणाले.