ऑनलाईन टीम / मुंबई :
मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्य सरकारने चाणाक्ष खेळी करत भोंग्याबाबतचा निर्णय केंद्राकडे टोलवला आहे. भोंग्याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असल्याने तो संपूर्ण देशासाठी लागू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही नियम करून ते सर्वच राज्यांसाठी लागू केले तर राज्या-राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करावी, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse-patil) यांनी सांगितले.
वळसे-पाटील म्हणाले, राज्य सरकार केवळ भोंग्यांची वेळ आणि आवाजाची मर्यादा पाळायला लावू शकतं. सकाळी 6 ते रात्री 10 भोंगे बंद करता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार आहे. कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. भोंग्यांसदर्भात आतापर्यंत झालेल्या बैठकींच्या निष्कर्षाच्या आधारे आजचा निर्णय घेण्यात आला आहे.
भोंग्यांसदर्भात कोर्टाने निर्णय दिल्यामुळे भोंगे हटवायचे की ठेवायचे यासंदर्भात केंद्राने निर्णय घेऊन तो लागू करावा. त्यामुळे राज्या-राज्यांमध्ये परिस्थिती वेगळी राहणार नाही. दरम्यान, आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनेक नेते उपस्थित होते. मात्र, भाजपचे नेते उपस्थित नव्हते.