भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करण ही आक्षेपार्ह बाब असून, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चुकले असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल असेही ते म्हणाले. काल केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी अमित शाह यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या आंदोलनावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले त्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेवर दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी ते म्हणाले, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच. तसेच भाजप विरोधात लढण्यासाठी आता एकत्र काम करण्याची गरज आहे. सध्या मविआत सर्व आलबेल आहे, कोणतीही गडबड नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार आहेत. देशातील भाजप विरोधातील पक्षांनी एकत्र येत लढावं असेही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेविषयी बोलताना ते म्हणाले, पुण्यातील परवानगी नाकारण्याचे काहीही कारण नाही.पोलिस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ते सभा घेऊ शकतात. दरम्यान केतकी चितळे हिच्या पोस्टचे समर्थन करणाऱ्य़ा सदाभाऊ खोत यांनाही खडेबोल सुनावले. अशा विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये असेही ते म्हणाले. यावेळी नाना पटोलेंचा समाचार घेताना ते म्हणाले, त्यांनी जबाबदारीनं वक्तव्य करावे. धार्मिक तेढ निर्माण होवू नये याची काळजी सर्व समाजातील बाधवांनी घेतली पाहिजे. त्यादृष्टीने वातावरण शांत ठेवले पाहिजे. पोलिस आपापल्या परीने काम करत असल्याचे ते म्हणाले.