मुंबई : सरपंच थेट करता, मग मुख्यमंत्री पण थेट करा, पंचायत समितीचा सभापती पण थेट करा, राष्ट्रपती देखील थेट करा असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट-भाजप सरकारवर संतापले. अजित पवार म्हणाले. लोकशाहीत जे दिले त्याचे पालन करावे लागते. सरपंच आणि नगराध्यक्ष एका विचाराचे असतात. बॉडी दुसऱ्या विचारांची असते. त्यामुळं बॉडीला विचारुन निर्णय घेतले जात नाहीत. मग एकहाती जाते आणि हे लोकशाहीला घातक असते. मात्र दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यानं त्यांना हा निर्णय घेण्याची घाई झाल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराला इतका उशीर का? असेही पवार म्हणाले.
विश्वासदर्शक ठराव पास केला, अध्यक्ष नेमला मग मंत्रिमंडळ विस्तार का केला नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याठिकाणी पालकमंत्री नेमणे गरजेचं आहे. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जनतेच्या वतीने मी विनंती करतो की, मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार करावा असेही अजित पवार म्हणाले.पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा चर्चेला घ्यायला पाहिजे होता. त्यावर काही सूचना आल्या असत्या. त्यावर चर्चा झाली असती, ते जास्त योग्य ठरले असते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यात मध्यवर्ती निवडणूक होतील का? असा सवाल देखील अजित पवार यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, मध्यवर्ती निवडणूक होतील असं अजिबात वाटत नाही.