प्रतिनिधी /म्हापसा
साळगाव पठारावरील कचरा प्रकल्पातून साठवून ठेवलेल्या कचऱयाचे पाणी साळगाव येथील सालमोना झरीत येऊन साठल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. कोटय़ावधी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या या झरीमध्ये वरून वाहून आलेला कचरा व पाणी साठल्याने गावातील नागरिकांनी येथे कपडे धुणेही बंद केले आहे. या भागात घाणीचे पाणी येऊन अडवून राहिल्याने झर प्रदूषित झाली आहे. स्थानिक पंचायत तसेच संबंधित अधिकारी वर्गांनी याकडे त्वरित लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अन्यथा या विरुद्ध आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा साळगाव वासियांनी दिला आहे.
माजी मंत्री जयेश साळगावकर यांच्या कालावधीत सुमारे 90 लाख खर्चून सालमोना झरीचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र आज या झरीत कचरा प्रकल्पातील लिचर्डचे पाणी खाली येऊन ही झर प्रदूषित झाली आहे. हे पाणी या गावातील विहिरीमध्येही गेल्याने येथील नागरिकांच्या विहिरीही प्रदूषित झाल्या असून काही नागरिकांनी विहीरीचे पाणी पिणेही बंद केले आहे.
खोदलेल्या पीठातील कचऱयातून पाणी झिरपते
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार साळगाव कचरा प्रकल्पात बाहेरून कचरा घेऊन येणारे ट्रक तेथे पीठ खोदकाम करून सर्व ओला कचरा टाकण्यात येतो. ते पीठ सर्व फुल्ल झाले असून पावसात त्या पाण्यातून सर्व लिचर्ड घाण पाणी कचरा झिरपून तसेच व्हाऊन पठारावरून खाली गावात येतो. त्यामुळे साळगावातील विहीरी दुर्गंधी पाण्याने भरून गेल्या आहेत आणि त्याचे ताजे उदाहरण म्हणजे साळगावातील सालमोना झर आहे. याकडे सरकारने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी साळगाव वासियांनी केली आहे.