राज्यात काँग्रेस नेत्याची पहिली प्रचारसभा
वृत्तसंस्था/ सूरत
गुजरातच्या निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही सहभाग घेतला आहे. सोमवारी राज्यात त्यांनी स्वतःची पहिली प्रचारसभा घेतली आहे. सूरत येथे बोलताना त्यांनी भाजपने राज्यातील तरुणाईचा अपेक्षाभंग केल्याचा दावा केला. 70 दिवसांपूर्वीन आम्ही यात्रा करत आहोत. लाखो लोक आमच्यासोबत यात्रेत सामील झाले आहेत. सर्व जाती अन् धर्माच्या लोकांचा यात समावेश आहे. या यात्रेदरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला तरीही यात्रा थांबली नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान जोडण्याचे काम एका गुजराती म्हणजेच महात्मा गांधींनी केले होते. आम्ही शेतकऱयांशी बोलतो तेव्हा त्यांचे दुःख जाणवते. शेतकऱयांना योग्य दर मिळत नाही, त्यांचे कर्ज माफ होत नाही. तरुणाईच्या स्वप्नांना देशात पायदळी तुडवले जात आहे. हिंदुस्थानचे पहिले आणि खरे मालक हे आदिवासी आहेत. आदिवासींना त्यांच्या जमिनींवरून बेदखल करण्यात येत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
माझी आजी म्हणजेच इंदिरा गांधी यांनी देशाचे पहिले मालक आदिवासी आहेत हे मला शिकविले. परंतु आदिवासींची प्रगती व्हावी असे भाजपला वाटत नाही. भाजप आदिवासी नव्हे तर वनवासी संबोधून त्यांची ओळख मिटवू पाहत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान शेतकरी, तरुण-तरुणी, आदिवासींना भेटून, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर त्यांचे दुःख जाणले. आदिवासींचा इतिहास अन् जगण्याची पद्धत सुरक्षित रहावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखून गुजरातमध्ये प्रचार चालविला आहे.