सैन्याने 330 जणांना वाचविले : केंद्राकडून 40 कोटीची मदत
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुरा हे राज्य सध्या भीषण पूरसंकटाला सामोरे जात आहे. स्थिती पाहता सैन्य आणि एनडीआरएफच्या जवानांना मदत तसेच बचावकार्यात सामील करण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये सैन्याने आतापर्यंत 330 हून अधिक जणांना पूरातून वाचविले आहे. तर पूरग्रस्त भागांमध्ये आता आसाम रायफल्सच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
त्रिपुरामध्ये पूर आणि भूस्खलनांच्या घटनांमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. पूरामुळे 65 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले असून ते 450 मदतशिबिरांमध्ये राहत आहेत.
ऑपरेशन जल राहत
त्रिपुरामध्ये ऑपरेशन जल राहत अंतर्गत मदत अन् बचाव मोहिमेदरम्यान 330 हून अधिक लोकांना वाचविण्यात आले असल्याची माहिती सैन्याने दिली आहे. आसाम रायफल्सच्या 21 सेक्टर मुख्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दोन तुकड्यांना पूरग्रस्त अमरपूर, भामपूर, बिशलगढ आणि रामनगरमध्ये तैनात करण्यात आले आहे. तर 7 नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केंद्राकडून मदत जाहीर
केंद्र सरकारने पूरग्रस्त त्रिपुराच्या मदतीसाठी 40 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. त्रिपुरामधील आमच्या बंधूभगिनींसोबत या संकटकाळात मोदी सरकार खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहे. राज्य सरकारच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 11 टीम्स, सैन्याच्या तीन तुकड्या, वायुदलाची 4 हेलिकॉप्टर्स त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी हवाईपाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त गोमती आणि दक्षिण त्रिपुराच्या भागांचा दौरा केला. पूरामुळे मोठ्या संख्येत लोकांना सुरक्षित स्थळी विस्थापित व्हावे लागले आहे. पूरसंकट पाहता मुख्यमंत्री साहा यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्देश दिला आहे.