प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणलोट क्षेत्रातून कोयना धरणात प्रतिसेकंद 49 हजार 325 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ सुरू झाली आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच असल्याने बुधवारी सायंकाळी 5 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कोयना नदीवरील मुळगाव या पुलाला पाणी घासून चालले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडय़ापासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाटय़ाने वाढून धरणाच्या पाणीसाठय़ाने चाळीशीच्या टप्पा पार केला आहे. नुकताच पावसाळा सुरू झाला असल्याने आणि अद्यापही संपूर्ण चार महिने पावसाचे बाकी असताना धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने होत असलेली वाढ नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजता कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, उपविभागीय अधिकारी आशिष जाधव यांच्या उपस्थितीत धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. या विसर्गामुळे अगोदरच दुथडी वाहात असलेल्या कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 70 (1633) मिलिमीटर, नवजा येथे 79 (2079) मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 137 (2041) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणात 40.63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.