धामोड / प्रतिनिधी
धामोड ( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयात ९३ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने आज गुरूवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जलाशयाच्या तिन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग तुळशी नदीपात्रात सोडण्यात आला. संभाव्य पाऊस, जलाशयात येणारा ईतर पाण्याचे स्त्रोत व पंचगंगा पुरस्थिती याचा विचार करता जलाशयातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तुळशी नदीच्या पाणीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे.
अधिक वाचा – कोगे येथे अतिवृष्टीमुळे घराची झाली पडझड; ७० हजारचे नुकसान
गेल्या आठवडाभरापासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून चोवीस तासात ११२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. आज अखेर धरण क्षेत्रात २६३५ मिली मिटर इतक्या पावसाची नोंद झाली असून ६१५ .५८ मीटर इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण ९३ टक्के इतके भरले आहे. केळोशी लघुप्रकल्पाच्या उजव्या सांडव्यातून तसेच पाऊस, अंतर्गत ऊगाळ, ओढे -नाले या माध्यमातून जवळपास १५०० ते १६०० क्युसेक्स वाहते पाणी येत आहे. गतसाली २६ जुलै रोजी जलाशय ९६ टक्के इतके भरले होते. तर १९७८पासून आजतागायत जलाशय २३ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.संभाव्य पाऊस व पंचगंगा पुरस्थितीचा विचार करून आज जलाशयातून पाणी सोडण्यात आले. नदीतिरावरील ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे .
धामोड ( ता. राधानगरी ) येथील तुळशी नदीवर १९६५ साली बांधकामास सुरवात झालेल्या जलाशयात १९९७८पासून पाणी साठवण्यास सुरवात झाली. ६१६.९१ मीटर पाणी साठवण ( ३ .४७ टीएमसी ) क्षमता असणाऱ्या या जलाशयाच्या पाण्यामुळे जवळपास ५८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन हरीतक्रांती झाली . नदीतीरावर ३२०० वैयक्तिक व सार्वजनिक पाणी योजना कार्यान्वित असून हरितक्रांतीस वरदान ठरलेला जलाशय म्हणून ‘तुळशी ‘ जलाशयाकडे पाहीले जाते .