प्रतिनिधी/ वडूज
कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांत बंद झालेली ग्राहक पंचायतीची बैठक यापुढे नियमीतपणे दरमहा सुरू राहील, असे तहसिलदार किरण जमदाडे यांनी सांगितले. दरम्यान तब्बल दोन वर्षांनी झालेल्या या बैठकीत ग्राहकांनी वीज कंपनी, स्टेट बँक, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख अश्या विभागांच्या समस्यांचा पाढा वाचला.
येथील तहसिलदार कार्यालयात विविध विभागांचे शासकीय अधिकारी व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, ग्राहक यांची बैठक झाली. त्यावेळी तहसिलदार श्री. जमदाडे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी उदय साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. पी. डी. कुलकर्णी, प्रा. नागनाथ स्वामी, विद्याधर कुलकर्णी, प्रा. अजय शेटे, संभाजीराव इंगळे, नारायणराव पाटील, सिध्दराम गोसावी, राजेंद्र पवार, मुन्नाभाई मुल्ला, गुरूप्रसाद गोसावी, सुभाष घाडगे, पुरवठा विभागाचे श्रीकांत शेंडे, बांधकाम विभागाचे श्री. देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी एकाच वीज जोडणीचे एकाच ग्राहकाला दोन वेगवेगळी विजबिले येत असल्याची तक्रार अरूण पवार (बुध) यांनी मांडली. विज कंपनीकडे कागदपत्रांची पूर्तता करून सुध्दा 2013 सालापासून शेतीपंपाची विज जोडणी मिळाली नसल्याचे बबन भुजबळ (डिस्कळ) यांनी सांगितले. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या येथील शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी असते, ग्राहकांच्या तुलनेत बँकेत काम करण्यासाठी अधिकारी, कर्मचायांची संख्या कमी जाणवते त्यामुळे बँकेत कामकाजासाठी व्यापारी तसेच विविध घटकांतील लोकांचा नाहकपणे अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे त्याठिकाणी अधिकारी, कर्मचाऱयांची संख्या वाढवावी ग्राहकांना विनयशिल वागणूक मिळावी, एटीएम मशिनही सातत्याने बंद असल्याची चर्चा झाली. वडूज आगारातून अनेक एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. भूमी अभिलेख कार्यालयातून स्थावर मिळकत प्रमाणपत्र मिळत नाही. नागरिकांना कामासाठी सातत्याने हेलपाटे मारावे लागतात, नागरिकांना संबंधित अधिकायांना भेटता येत नसल्याची तक्रारही मांडण्यात आली. अंबवडे येथील गावठाणाचा प्रश्न गेली 28 वर्षे प्रलंबीत असल्याचीही यावेळी चर्चा झाली. यावेळी प्रा. स्वामी, कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.
तहसिलदार जमदाडे म्हणाले, ग्राहक व प्रशासन यांच्यातील ग्राहक पंचायत ही ख्रया अर्थाने दुवा आहे. ग्राहकांची होणारी फसवणूक पंचायतीद्वारे प्रशासनाकडे मांडली जाते त्यानंतर त्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा करून समस्या मार्गी लावली जाते. ग्राहक पंचायतीने खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबत ग्राहकांमध्ये अधिकाधिक जागरूकता निर्माण करावी. यापुढे ग्राहक पंचायत व प्रशासकीय अधिकारी व ग्राहकांची बैठक नियमीतपणे घेतली जाईल.