वार्ताहर /पालये
मांदे येथील ’साहित्य संगम’ चा तीनशे शहाऐशीवा मासिक कार्यक्रम मळेकरवाडा,मोरजी येथे गायक तथा नाटय़कलाकार प्रभाकर विठ्ठल गांवकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नाटककार वि.वा.शिरवाडकर यांच्या’वीज म्हणाली धरतीला’ या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील नाटकावर चर्चा करण्यात आली.
नाटय़कलाकार नारायण विठ्ठल सावंत यानी या नाटकावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अंकानुसार नाटकाचे कथानक सांगून त्यानी नाटकातील पात्रांचा सविस्तर परिचय केला.
‘वीज म्हणाली धरतीला’ हे राणी लक्ष्मीबाई यांच्या राष्ट्रीय बाण्यावर प्रकाश टाकणारं नाटक एक साहित्यकृती म्हणून उत्कृष्ट असले,तरी रंगभूमीवर सादर करण्यासाठी खूप कठीण असल्याचे मत चर्चेत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यजमान प्रभाकर गांवकर यानी शारदास्तवन व स्वागतगीत सादर केले.उत्कृष्ट शिक्षक राज्य पुरस्कार विजेते गोपाळ सावंत यानी सादर केलेल्या ‘नमन नटवरा…’ या नांदीनंतर कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.युवा तबलापटू अजित शेटगांवकर यानी तबला साथ केली.
या कार्यक्रमास ‘साहित्य संगम’चे कार्यवाह गजानन मांदेकर, दिलीप मेथर,निरंजन मांदेकर,संध्या आरोलकर, गणेश गांवकर,हरी शेटगांवकर,श्रेया फडते,भोलेश नाईक हे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘साहित्य संगम’ चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर यानी स्वागत व परिचय केला, तर शरद गावडे यानी शेवटी ऋणनिर्देश केला.