माजी आमदार मदनदादा भोसले,
वार्ताहर/ भुईंज
किसनवीरच्या शेतकरी, कामगारांची जी काही देणी असतील ती देण्याची, कारखाना सुरळीपणे चालवण्याची आणि तो शेतकऱयाच्याच मालकीचा ठेवण्याची जबाबदारी माझी असून हा माझा शब्द आहे. मी जेव्हा शब्द देतो तो पाळतो. अशी गर्जना आमदार महेश शिंदे यांनी पाचवड व केंजळ येथील सभेत करुन मदन भोसले यांच्यासमोर अडचणी उभ्या करुन किसन वीर हपडण्याचे आखलेले षडयंत्र उधळून लावा असे आवाहन केले. तर जरंडेश्वरवरील शेतकऱयांची मालकी मिटवणाऱयांनी प्रतापगडबाबत तोच प्रयत्न करणाऱयांनी हिंदुस्थान शुगर कारखान्यासाठी पैसे गोळा करुन हडपणाऱयांनी किसनवीरवरील शेतकऱयांची मालकी हटवण्याचे षडयंत्र रचले असून ते उधळून लावा, असे आवाहन मदन भोसले यांनी केले.
शेतकरी विकास पॅनेलच्या सभेत आमदार शिंदे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा किसन वीर कारखाना एकटा होता तेव्हा शेतकऱयांच्या उसाला उच्चांकी दर मिळाल्याचा इतिहास विसरता येणार नाही. त्याचसोबत प्रतापगड कारखान्याची शेतकऱयांची मालकी राखताना शेतकऱयांच्या मालकीचा नवा कोरा खंडाळा कारखाना उभारला. या सर्व प्रगतीचा धसका घेऊनच किसनवीरला अडचणीत आणण्यासाठी कुटील कारस्थानं रचली गेली. कालवा, कांगावा करायला सुरुवात झाली. जरंडेश्वर कारखान्याचा चटका आम्ही सोसला आहे त्यामुळे तुम्हाला सांगायला आलोय सावध रहा नाहीतर तुम्हालाही चटका बसेल.
शेतकऱयांचे एक रुपयाचेही देणे ठेवणार नाही-मदन भोसले
यावेळी मदन भोसले म्हणाले, खासगी कारखाने चालावेत यासाठी किसन वीर बंद पाडण्याचा डाव आखणाऱयांनी त्यासाठीच खंडाळा कारखाना बंद ठेवला. त्यांनी खंडाळा कारखान्यात सत्ता हस्तगत केल्यानंतर दुसऱया दिवशी कारखाना त्यांच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र यांनी जरंडेश्वरवरील शेतकऱयांची मालकी घालवली, प्रतापगडबाबत तोच डाव होता, खंडाळा कारखाना सुरु करण्याची तयारी दाखवली नाही आणि आता किसन वीर कारखाना चालवू म्हणतायेत. विरोधकांना शेतकऱयांचा कसलाही कळवळा नसून किसनवीरवर घाला घालण्यास आलेले मारेकरी आहेत. खंडाळा उभा राहू नये म्हणून अडचणी आणणाऱयांनी गोळा केलेल्या हिंदुस्थान शुगरच्या शेअर्सच्या पैशाचे काय केले? ते पैसे परत कधी करणार? हिंम्मत असेल तर आमदारांनी कधीही एका व्यासपिठावर येऊन चर्चा करावी. ठिकाण, तारीख त्यांनी ठरवावी. मी तयार आहे. त्यांना फक्त लबाडय़ा जमतात. आज शेतकऱयांकडून 15 हजार रूपये घ्यायचे असे म्हणातात. वरून टनाला 1 हजार रूपये कापायचे म्हणतात. माझे वचन आहे सभासदांना देणे असलेल्या 54 कोटी रूपयांमधील एक रूपायाही देणे ठेवणार नाही.
विरोधकांची कारखाना चालवण्याची लायकी नसल्याचे सिद्ध झालेय
एसएमपी, एफआरपीपेक्षासुमारे 425 कोटी रूपये ऊस उत्पादकांना जादा देताना कुणाचे उसाचे टिपरे शिल्लक ठेवले नाही. चढ-उतार येत असतात. एक कुस्ती हरली म्हणून कोणी किस्ताक काढून ठेवत नाही. त्यांनी आणलेल्या अडचणींनी डगमगणारा हा मदन भोसले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱयांनी अजुनही 3 तारखेच्या आधी मला त्यांनी त्यांची प्रॉपर्टी द्यावी व माझी घ्यावी, हे मी पुन्हा सांगत आहे. कारखान्याला बँकांनी पैसे देऊ नयेत यासाठी प्रयत्न करणाऱयांनी सभासदांचे मोठे नुकसान केले आहे. कारखाना मागणाऱयांची तो चालविण्याची लायकी व कुवत नसल्याचे खंडाळयाने सिद्ध केलेय. मी शब्द देतो. अडचणी येत असतात. त्या आणल्या गेल्यात. मात्र मी त्यातून कारखान्याला सावरुन आण गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
यावेळी उमेदवार सीए. सी. व्ही. काळे, प्रविण जगताप, प्रताप यादव, पै. जयवंत पवार, विराज शिंदे, सुभाष खुडे, संतोष येवले, चंद्रकांत शेलार, पै. मधुकर शिंदे, पै. माणिक पवार, पाचवडच्या सरपंच सौ. अर्चना विसापुरे, मानसिंगराव शिंगटे, किकलीचे सरपंच धनंजय बाबर, भैय्यासाहेब जाधवराव, अतुलभैय्या कदम, प्रविण पवार, प्रशांत शिंगटे, डॅडी वाघ, हणमंत गायकवाड, सुनिल शिवथरे, जालिंदर गायकवाड, नारायण इथापे, सयाजी निकम, राजेंद्र इथापे यांची उपस्थिती होती.
मागच्या दाराने आमदार झालेल्यांची जीभ घसरु लागली
जरंडेश्वर कारखाना भांडवलदारांच्या घशात घालणारेच किसन वीर कारखाना गिळायला टपलेत. तिथे शेतकऱयांच्या बाजूने उभे न राहणारे बेताल झाले आहेत. मागच्या दाराने आमदार होऊन घोडय़ाची भाषा वापरणाऱयांची जीभ घसरायला लागलीय. हे जर यशवंत विचारांचे पाईक असते तर असली भाषा केली नसती. कोरेगावात आणि जावलीतही दणकं बसल्याने त्यांना काय बोलावं ते कळेना. शेतकऱयांकडून 15 हजार गोळा करण्याची, उसाला दहा वर्ष हजाराने दर कमी देण्याची भाषा करणारे कारखाना कसा चालवणार हे का सांगत नाहीत? माझ्याकडे त्याचे उत्तर आहे. मोकळी भलरी करणारा मी नव्हे. मी सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ज्या सूतगिरणीत हे स्वतः संचालक होते तिथे सूतगिरणीला काडीची मदत न करता ती अनेक वर्ष बंद ठेवली. खंडाळा जिंकून तो सुरु केला नाही. किसन वीर आजही शेतकऱयांच्या मालकीचा आहे आणि तो उद्याही शेतकऱयांच्या मालकीचा रहावा, सुरु रहावा यासाठी शेतकरी विकास पॅनेलला विजयी करा, असेही आवाहन त्यांनी केले.